उदगीर (प्रतिनिधी):
उदगीर आगारातून लातूरकडे जाणाऱ्या शिवशाही बसला आज उमा चौक परिसरात भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. डिझेल पाईप गरम होऊन फुटल्याने ही आग लागल्याचे प्राथमिक समोर आले असून, आगार प्रमुखांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात सापडल्याचा संतापजनक आरोप आता केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आज अंदाजे साडेसात वाजेच्या सुमारास शिवशाही बस प्रवाशांना घेऊन लातूरकडे निघाली होती. बस उमा चौकात आली असता, डिझेल टँकचा पाईप अतिउष्णतेमुळे फुटला आणि अचानक बसने पेट घेतला. बसमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. सुदैवाने, वेळीच सावधगिरी बाळगल्याने मोठा अनर्थ टळला आणि प्रवाशांचे प्राण वाचले.
आगार प्रमुखांच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचा जीव टांगणीलाउदगीर आगाराचा कारभार सध्या अत्यंत 'अंधाधुंद' पद्धतीने सुरू असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. आगारातील अनेक 'लालपरी' बस सध्या भंगार अवस्थेत आहेत, तरीही आगार प्रमुख अशा नादुरुस्त बसेस रस्त्यावर धावण्यासाठी पाठवत आहेत. बसेसच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.उदगीर आगारात अशा घटना वारंवार घडत असून, प्रवाशांच्या सुरक्षेबाबत आगार प्रमुख इतके उदासीन का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या गंभीर घटनेनंतर तरी वरिष्ठ प्रशासन याकडे लक्ष देऊन दोषींवर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Social Plugin